जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बगायतदार संघ पुणे विभाग यांच्या वतीने जुन्नर वं आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष बगायतदारांसाठी द्राक्ष बागांना भेटी व द्राक्षवरील चर्चासात्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांचे निवारण झाल्याने खेळीमेळीच्या उत्साही वातावरणात हे चर्चासत्र पार पडले.
यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अजयकुमार उपाध्याय यांनी सूक्ष्म घड निर्मितीसाठी द्राक्ष वेलीचे पोषण या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. एस. के. होळकर यांनी पावसाळ्यातील रोग व्यवस्थापन या विषयावर द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन केले .
गेल्या दोन महिन्यांपासून सततचा पाऊस, आद्रर्ता, ढगाळ हवामान यामुळे काडी पक्वतेसाठी तसेच सूक्ष्म घड निर्मितीसाठी मोठे अडथळे येत असून डाऊनी, करपा व भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि म्हणूनच यावर काय उपाययोजना कराव्यात, यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बगायतदार संघांचे पुणे विभागाचे संचालक कृषिभूषण जितेंद्र बिडवई व राहुल शेटे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उदघाटन कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बगायतदार संघांचे पुणे विभागाचे अध्यक्ष सुरेश कडलक, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, पुणे विभागाचे माजी अध्यक्ष भारत शिंदे, मानद सचिव गणेश सांगळे , कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.प्रशांत शेटे, संचालक राहुल दंडवते, नवनाथ सायकर, जायशिंग वायकर, सुहास थोरात, जितेंद्र बिडवई, संदीप वारुळे, राहुल शेटे, गुलाब नेहरकर, प्रकाश वाघ, भानुदास लेंडे, राहुल बनकर, संजय कानडे, आदिनाथ चव्हाण यांच्यासह द्राक्ष उत्पादक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घाडगे यांनी केले, प्रास्ताविक सुरेश कडलक यांनी केले तर आभार डॉ . दत्तात्रय गावडे यांनी मानले.



