केएल राहुल, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, जडेजा, सुंदर, बुमराह, सिराजच्या खेळीवर भारताची धुरा
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbaiive.com@gmail.com
नवी दिल्ली : भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना चार विकेट्स गमावले आहेत. इंग्लंडने भारतापुढे १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताची ४ बाद ५४ अशी अवस्था झाली आहे. भारताकडे अजून सहा विकेट्स आहेत. पण पाचव्या दिवशी जर त्यांना सामना जिंकायचा असेल, तर त्यांना अजून १३५ धावा कराव्या लागणार आहेत. वॉशिंग्टन सुंदरचा उपयोग गोलंदाजीपेक्षा फलंदाजीत जास्त होईल, असा विचार केला जात होता. मात्र त्याच वॉशिंग्टनने इंग्लंडचे सतावणारे तळाचे फलंदाज यावेळी डोकेदुखी ठरणार नाहीत ही काळजी घेतली, त्यामुळे भारतास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरी क्रिकेट कसोटी जिंकण्याची आशा आहे. भारताने इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांत संपवला. आता पाचव्या दिवशी ९० षटकांचा खेळ होईल आणि त्यामध्ये विजेता कोण, हे सर्वांसमोर येणार आहे.
भारताकडून केएल राहुल ३३ धावांवर नाबाद आहेत आणि नाइट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीप त्यांचा साथ देत होता. मात्र, दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्सने आकाशदीपला क्लीन बोल्ड करत भारताला चौथा धक्का दिला.
भारतीय गोलंदाजांचा कहर
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने एका ओव्हरमध्ये २ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी जेव्हा त्यांनी आपला डाव पुढे सुरू केला, तेव्हा भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर धडाकेबाज हल्ला चढवला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर कर्णधार बेन स्टोक्सने ३३ धावांचे योगदान दिले. या डावात एक क्षण विशेष गाजला, जेव्हा मोहम्मद सिराजने डकेटला आऊट केल्यानंतर उत्साहात साजरा करताना त्याचा खांदा डकेटला जाऊन लागला. या घटनेने मैदानावर वातावरण तापले.
यशस्वी जैस्वाल शून्यावर, तर शुभमन गिल ६ वर आऊट
लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी फलंदाजी करणे फारच कठीण वाटत होते. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला, तर करुण नायरने थोडा वेळ लढा दिला, पण १४ धावा करत पॅव्हिलियनमध्ये परतला. सलग दोन सामन्यांमध्ये शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल यावेळी फक्त ६ धावाच करू शकला.
राहुलवर अपेक्षा, पण अजून खडतर वाटचाल
दिवसाच्या शेवटी विकेट न गमावण्यासाठी आकाशदीपला नाइट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले. त्याने १० चेंडू खेळून वेळ काढला, पण शेवटच्या ओव्हरमध्ये स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याची खेळी संपुष्टात आली. आता भारताच्या हातात ६ विकेट्स शिल्लक असून १३५ धावांची गरज आहे. केएल राहुलला ऋषभ पंत, नितीश रेड्डी, जडेजा, सुंदर, बुमराह आणि सिराज यांच्याकडून साथ हवी आहे. पाचव्या दिवसावर अखेरचा निकाल अवलंबून असून, मैदानावर जोरदार थरार पाहायला मिळणार हे नक्की.



