नवी मुंबई : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून सोमवारी नगर परिषद, पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. लवकरच महापालिका निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर होईल. नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पॅनलच्या दृष्टीने राजकिय समीकरणांची मोर्चेबांधणीही सुरु झालेली आहे. पक्षनिष्ठा, नेत्यावरील श्रद्धा या गोष्टी आता नवी मुंबईत गौण ठरल्या असून कसेही करुन महापालिकेत जायचेच, मग कपाळावर कोणाचेही कुंकू व गळ्यात कोणाचेही मंगळसूत्र असू द्या अशा भूमिकेतून पॅनलमध्ये अनुकूल ठरेल अशी समीकरणे जमवली जात आहेत. आयाराम-गयारामाची संख्या वाढत चालली असून भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत महापालिका निवडणुकीत निकराची झुंज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऐरोलीचे दोन वेळा आमदार राहिलेले व बेलापुर मतदारसंघातून अवघ्या १५ दिवसामध्ये ९० हजाराहून अधिक मतदान घेतलेले संदीप नाईक काय भूमिका घेतात? याकडे राजकीय घटकांचे लक्ष लागून राहीले आहे.
नवी मुंबईतील राजकिय वर्तुळामध्ये जनाधार असलेले नेतृत्व म्हणून गेल्या काही वर्षांपासून संदीप नाईकांकडे पाहिले जात आहे. २००९ आणि २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संदीप नाईक निवडून आले होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये देशभरात मोदी लाटेमुळे सर्वत्र पडझडीची त्सुनामी होत असताना संदीप नाईकांनी ऐरोलीचा गड राखला होता. २००५ साली झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संदीप नाईक नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महापालिकेतील स्थायी समिती सभापतींनी वातानुकूलित कार्यालयात बसून कारभार सांभाळला होता. पण संदीप नाईकांनी या वहीवाटीला फाटा देत ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबवित प्रभागाप्रभागात पायी चालून, त्या त्या प्रभागातील स्थानिक नवी मुंबईकरांशी सुसंवाद साधत नागरी समस्यांची व नागरी सुविधांची पाहणी केली. स्थायी समितीत मंजुर झालेली विकासकामे कशा प्रकारे होतात, याची खातरजमा करुन घेतली. पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेतला. नवी मुंबई कार्यक्षेत्रात सर्वाधिक पायपीट केलेला व नवी मुंबईकरांशी सुसंवाद साधलेला नेता म्हणून संदीप नाईकांना नवी मुंबईकरांनी अनुभवले आहे. एक सुशिक्षित, थोडासा मितभाषी, आश्वासने नाही तर कृतीवर भर देणारा नेता अशी नवी मुंबईकरांमध्ये संदीप नाईकांची प्रतिमा आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष या नात्याने संदीप नाईकांनी पुन्हा प्रभागाप्रभागामध्ये पायपीट करताना संघटना बांधणी केली. लोकांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्यांची माहिती घेतली. गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात जावून लोकांशी सुसंवाद साधला. ऐनवेळी पक्षाने तिकिट नाकारल्यावर कार्यकर्त्यांच्या व नवी मुंबईकरांच्या आग्रहास्तव संदीप नाईकांना बेलापुर विधानसभा लढणे भाग पाडले. निवडणूकीदरम्यान राष्ट्रवादीची तुतारी हाती धरणाऱ्या संदीप नाईकांचा ३७७ मतांनी निसटता पराभव झाला असला तरी कमी कालावधीत ९० हजारांहून अधिक मते घेत दोन वेळा आमदार असलेल्या मंदाताई म्हात्रे यांना कडवी झुंज दिली. भाजपची रणनीती, व्यूहरचना, विशिष्ठ मतदारांचा भाजपवर असलेला प्रभाव पाहता नवी मुंबईकरांच्या पाठबळावर अवघ्या काही दिवसांमध्ये संदीप नाईकांना झालेले मतदान पाहता नवी मुंबईकरांचा जनाधार असलेला नेता अशी राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संदीप नाईकांची ओळख निर्माण झालेली आहे आणि हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.
पालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर अनेकांची जनसंपर्क कार्यालये बंद होतात, जनतेला पराभूतांचे दर्शनही दुर्लभ होते, पण संदीप नाईकांनी नवी मुंबईकरांशी असलेला संवाद कायम ठेवला. जय-पराजय होत असतो, पण मतपेटीतून विश्वास दाखविणाऱ्या नवी मुंबईकरांना संदीप नाईकांनी वाऱ्यावर सोडले नाही. बेलापुरच्या कार्यालयात आजही संदीप नाईक नवी मुंबईकरांना भेटत आहेत, त्यांच्या समस्या सोडवत आहेत. संवाद कायम ठेवून आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेमध्ये निर्माण झालेला वाद जगजाहीर आहे. युती होण्याची शक्यता मावळली आहे. महापालिका निवडणुकीत संदीप नाईकांची राजकीय भूमिका महत्वाची ठरणार आहे. संदीप नाईकांवर विश्वास ठेवणारे मतदार संदीप नाईकांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. निवडणुकांच्या अगोदर संदीप नाईकांच्या राजकीय वाटचालीवर पालिकेचा सत्तासुकाणू निश्चित होणार आहे.



