सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या ५ टी –२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना तिरुवनंतपुरममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने धावांचा बचाव करताना ३० धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २२२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने दमदार सुरुवात केली. पण शेवटी भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यासह भारतीय संघाने विजयाचा चौकार मारत मालिकेत ४–० ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर २२१ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्माने १६२ धावांची विक्रमी भागीदारी केली. शफाली वर्माने ७९ धावा केल्या. तर स्मृती मानधनाने ८० धावांची खेळी केली. ही जोडी फुटल्यानंतर ऋचा घोषने नाबाद ४० धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद १६ धावा केल्या. यासह भारतीय संघाने २ गडी बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेकडून हसिनी परेराने ३३ धावांची खेळी केली. तर चमिरा अटापटूने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. हर्शिथा समरविक्रमाने २० धावांची खेळी केली. तर कविशा दिलहारीने १३ धावांची खेळी केली. निलक्षी डी सिल्वा २३ धावांवर नाबाद राहिली तर कौशिनीने ५ धावांची खेळी केली. श्रीलंकेला ६ गडी बाद १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. पण श्रीलंकेचा संघ विजयापासून ३० धावा दूर राहिला.
स्मृती मानधनाच्या १० हजार धावा पूर्ण
या सामन्यात भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा पल्ला गाठणारी फलंदाज ठरली आहे. याआधी मिताली राजने १० हजार धावांचा पल्ला गाठला होता. स्मृती मानधना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठणारी चौथी फलंदाज ठरली आहे.




