नवी मुंबई : गेली अनेक वर्षे कामगारांसाठी महापालिका, सिडको, एमआयडीसी, बाजार समिती व अन्य खासगी कारखाने-कंपन्यांमध्ये सातत्याने काम करणारे कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या पराभवाचे कामगार वर्तुळावर सावट पडले असून कामगार क्षेत्रामध्ये एका चांगल्या माणसाचा पराभव झाल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.
कॉंग्रेस पक्षसंघटनेसाठी आपली हयात घालवून व पक्ष संघटना नावारुपाला आणण्यासाठी सातत्याने आंदोलने, निदर्शने करुनही पक्ष तिकिट देत नसल्याचा संतापही कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी कॉंग्रेस सोडलेली असताना पडझडीच्या काळात बेलापुर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे तारणहार बनलेले रविंद्र सावंत यांचे तिकिट कापण्यात आल्याने त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याची चर्चा कामगार वर्गात खुलेआमपणे होत आहे.
नवी मुंबई इंटकच्या माध्यमातून व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून महापालिकेतील कायम आस्थापनेतील, ठोक, कंत्राटी कर्मचारी तसेच तासिका शिक्षक, परिवहन विभागाचे कर्मचारी यांच्यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका मुख्यालय ते मंत्रालय सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना सुविधाही उपलब्ध करुन दिल्या आहेत. सेवेतील प्रश्न सोडविण्यासाठी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला आहे. रविंद्र सावंत निवडणूकीला उभे राहिल्यावर कामगार वर्गातून जल्लोष साजरा करण्यात आला. आपला आवाज आता महापालिका सभागृहात उठविणारा हक्काचा माणूस सभागृहात असणार असल्याचा आनंदही कामगारांकडून व्यक्त करण्यात आला होता. रविंद्र सावंत यांच्या पराभवाचे वृत्त समजताच कामगार वर्गाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविंद्र सावंत हे लढवय्ये नेतृत्व असून त्यांनी पराभवाकडे दुर्लक्ष करुन पुन्हा एकदा कामगारांसाठी व समाजासाठी स्वत:ला झोकून द्यावे, असा सूर कामगारांकडून आळविला जात आहे.



