नवी मुंबई : मनसे मराठी भाषेचा मुद्दा सोडत नसल्याचे नवी मुंबई महापालिकेच्या महासभेमध्ये पहावयास मिळाले. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचे वारे वाहत असताना, मूळ मराठी शाळांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी शहरातील मराठी शाळांकडे दुर्लक्ष करू नका, अशी मागणी आयोजित पालिकेच्या महासभेत केली.
नवी मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाच्या ताफ्यात आजच्याघडीला ८० शाळा आहेत. यामध्ये तीन सीबीएसई व महाराष्ट्र राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळादेखील आहेत. पन्नास हजारांच्या आसपास विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. ही वस्तुस्थिती असताना आज प्रत्येक जण दिल्ली मंडळाच्या महणजेच सीबीएसई वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा आग्रह धरत आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या वर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
मराठी भाषा ही आजतरी आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. जर सगळीकडेच इंग्रजी भाषेचा आग्रह धरला तर भविष्यात दळणवळणासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मराठी भाषे बरोबरच इंग्रजी भाषेचा आग्रह धरणे गरजेचे आहे. असे केले तरच आपली मातृभाषा टिकेल, असेही ते म्हणाले,
मराठी भाषेत पूर्ण शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविले आहे. जो विद्यार्थी खरोखरच प्रज्ञावंत आहे, त्याला कोणत्याही माध्यमात टाका, त्याला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे सीबीएसई माध्यमाच्या शाळा सुरू करून काय साध्य होणार? विहिरीत पाणी असेल तरच पोहऱ्यात येईल. ही परिस्थिती असल्याचे उदाहरण त्यांनी यावेळी दिला.
आपले नवी मुंबई शहर हे सायबर सिटी म्हणून ओळखले जाते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु शहरात जागतिक दर्जाचे शिक्षण देताना मराठी बोर्डाला डावलू नका, मराठी शाळा जगली तरच मराठी संस्कृती टिकेल. त्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत. यासाठी मी आग्रह धरणार असल्याचे अभिजीत देसाई यांनी शेवटी सांगितले.
अन्य महापालिकाच्या शाळांमध्ये मराठी टक्का घसरत असताना नवी मुंबई महापालिकेत टक्का सुधारत आहेत. नागरीकरण वाढत असतानाही नवी मुंबई मनपाच्या शाळांतील वाढती संख्या सुखावह असल्याने सीबीएसईचे उदात्तीकरण करण्याच्या नादात मराठी शाळांना टाळे लागू नये यासाठी मनसे पुढील काळात आक्रमक राहणार असल्याचे संकेत मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी दिले आहेत.

