नवी मुंबई : जुईनगर – नेरूळ नोडमध्ये होणारा दूषित पाणीपुरवठा तातडीने थांबविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉग्रेसच्या सरचिटणिस श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जुईनगर-नेरूळ नोडमध्ये पिवळसर स्वरुपातील दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेकजण आजारी पडले आहेत. या दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण न झाल्यास अनेकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा आता आठ दिवसांवर आलेला आहे. पावसाळ्यात सुरुवातीच्या दिवसात गढूळ पाणी येते. त्यामुळे आपण तातडीने दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करुन जुईनगर व नेरूळमधील जनतेला दिलासा देण्याची मागणी श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

