स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या कार्यालयात नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा निरोप समारंभाचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत व अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
परिवहन विभागातून ठोक मानधनावर काम करणारे वाहक अशोक गवांदे मे महिन्यात सेवा निवृत झाले, त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यावेळी पार पडला. यावेळी तब्बल १६ ते १८ वर्षे परिवहन विभागात काम करुन निवृत्त होताना हातात पीएफ नाही, पेन्शन नाही, ग्रॅज्युईटी नाही, अशी खंत कामगार नेते रविंद्र सावंत यांनी व्यक्त केली.
महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना निवृत्त होताना पीएफ व पेन्शन भेटत नाही. आपण स्वत: पाठपुरावा करुन या समस्येचे निवारण करणार. याप्रकरणी जे अधिकारी दोषी असतील, त्यांना त्यांची जागा दाखवून देणार. महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही कर्मचारी केवळ जोडतच नाही, तर त्यांच्या अडीअडचणीच्या काळात मदतीला धावूनही जात असते. आजारपणात आर्थिक मदतही करत असल्याचे रविंद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.
परिवहन सभापती आणि त्यांच्या पूर्ण टीमने कर्मचाऱ्यांना ७ हजार रुपये पगारवाढीचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय अजून लागू झाला नाही. निर्णय हा फक्त कागदावरच राहणार की प्रत्यक्ष ठोक मानधन कर्मचारी यांच्या खात्यात जमा होणार, याबाबत चित्र अजूनही स्पष्ट नाही. खरेतर कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन किंवा कायम करण्याचा प्रस्ताव घ्यायला हवा होता., अजून वाहक चालक कर्मचाऱ्यांना मेडिकलेमची सुविधा नाही , उद्या मोठा अपघात झाला तर आरोग्य सुविधा कोण देणार, उपचाराचा खर्च कोण करणार, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर मेडिक्लेम देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी यावेळी केली.


