अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांचे महापालिका आयुक्तांना साकडे
नवी मुंबई : सानपाडा गाव, सानपाडा कॉलनी, सानपाडा पामबीच परिसरातील गृहनिर्माण सोसायटीमधील सदनिकांत जावून दूषित पाण्याची तपासणी करण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून पिवळसर रंगातील दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी उकळले तरी पाण्याचा पिवळसरपणा जात नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत पिवळसर रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिका प्रशासनाकडून व राजकीय घटकांकडून पाण्याच्या टेस्ट होत असल्याच्या बातम्या वाचतो, पण दूषित पाण्याचा पिवळसरपणा समस्येचे निवारण झालेले नाही. या पिवळसर पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. पाण्याच्या टेस्टच्या राजकारण्याच्या व प्रशासनाच्या बातम्या वाचून आता कंटाळा आला आहे. ही कार्यवाही प्रामाणिकपणे होत आहे का नुसती स्टंटबाजी आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्या दूषित पिवळसर पाण्यामुळे दगावल्यास त्या दुर्घटनेची जबाबदारी कोण स्विकारणार? या समस्या निवारणासाठी यापूर्वी आपल्या कार्यालयात लेखी तक्रार केली होती. समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास न आल्याने समस्येचे निवारण झालेले नाही. तथापि आजही पिवळसर रंगातील दूषित पाण्याचाच पुरवठा होत आहे. घरातील शौचालयाच्या भांड्याचीही दिवसातून दोन ते तीन वेळा सफाई करावी लागत आहे. नाहीतर घरातील शौचालयाचे भांडे पिवळसर पाण्यामुळे सार्वजनिक शौचालयाचे भांडे भासते. समस्या गंभीर आहे. पाणी शुद्धीकरणाच्या व तपासणीच्या बातम्या आता खूप झाल्या, लोकांना पिवळसर दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण हवे आहे. केवळ जलकेंद्रावर जावून पाण्याची तपासणी केल्यावर वर्तमानपत्रात बातम्या येतात, समस्येचे निवारण होत नाही. आपण स्वत: अथवा संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानपाडा गाव, सानपाडा कॉलनी, सानपाडा पामबीच परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांतील सदनिकांमध्ये जावून दूषित पिवळसर रंगाच्या येत असलेल्या पाण्याची तपासणी करावी. सकाळी व संध्याकाळी ज्यावेळी पाणी येते, त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ते पाणी पिण्यासाठी पाठवावे, म्हणजे सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरातील लोक कोणते पाणी पितात,याची त्यांना माहिती होईल व समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. समस्येचे गांभीर्य पाहता आपण पिवळसर रंगाच्या दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
