जयेश खांडगेपाटील याजकडून
काळवाडीतील प्रत्येक रात्र मृत्यूच्या छायेत
१२ वर्षांपासून पुनर्वसनाच्या आश्वासनांचा खेळ
डोंगराच्या कुशीत अडकले शेकडो जीव
जुन्नर : ‘दरड कोसळण्याआधी सरकार जागे होणार की पुन्हा शेकडो निष्पाप जीव मातीखाली गाडले गेल्यानंतर?’ हा प्रश्न आज आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी ग्रामपंचायत हद्दीतील काळवाडी क्रमांक १ आणि २ मधील प्रत्येक कुटुंब प्रशासनाला विचारत आहे. कारण गेल्या पाच-सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने या गावांवर पुन्हा एकदा मृत्यूचे सावट गडद केले आहे.
गावाच्या माथ्यावर दरड कोसळण्याच्या स्थितीत असलेला डोंगर, पायथ्याशी डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि गावाच्या मध्यभागातून गेलेली मोठी भेग. या तिहेरी संकटाच्या विळख्यात अडकलेल्या ग्रामस्थांचा प्रत्येक श्वास आज भीतीने अडकला आहे. घरांच्या भिंतींना पडलेल्या भेगा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. डोंगरातून झिरपणारे पाणी थेट घरात शिरत आहे. प्रत्येक मुसळधार सरीसोबत मृत्यू आणखी जवळ येत असल्याची भावना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
रात्र झाली की गावात शांतता नसते; असते ती फक्त भीती. प्रत्येक आवाजाने कुटुंबे दचकतात. लहान मुलांना कुशीत घेऊन आई-वडील रात्रभर जागे राहतात. वृद्धांच्या डोळ्यांत झोप नाही; तरुणांच्या मनात असहाय्यता आहे. संसार एका क्षणात दरडीखाली गाडला जाईल, या विचाराने प्रत्येक घर हादरले आहे.
२०१४ मध्ये माळीण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्या दुर्घटनेनंतर धोकादायक गावांचे सर्वेक्षण झाले. काळवाडी क्रमांक १ आणि २ या गावांचाही पुनर्वसनासाठी विचार झाला. पण बारा वर्षे उलटली, सरकारे बदलली, अधिकारी बदलले, बैठका झाल्या, पंचनामे झाले, आश्वासने मिळाली… मात्र बदलले नाही ते काळवाडीचे नशीब.
प्रत्येक पावसाळ्यात अधिकारी येतात, परिस्थितीची पाहणी करतात, धोक्याचा इशारा देतात आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देऊन निघून जातात. पण भरलेले घर, जनावरे, शेती आणि आयुष्यभराचा संसार सोडून ग्रामस्थ कुठे जाणार? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
ग्रामस्थ चिमाजी पारधी आणि विठ्ठल पारधी यांचा संताप शब्दांतून ओसंडून वाहतो. “दरवर्षी अधिकारी येतात, फोटो काढतात, पंचनामे करतात आणि निघून जातात. मागच्या वर्षी मोठमोठे दगड वस्तीपर्यंत आले होते. पुढच्या पावसाळ्यापूर्वी घरे देऊ, असे सांगितले होते; पण काहीच झाले नाही. आम्हाला आणखी किती दिवस फसवणार?”
नामदेव भोकटे यांच्या डोळ्यांतली भीती बोलकी आहे. “आम्हाला आलिशान घर नको, पण सुरक्षित घर हवे. रोज रात्री मुलांना कवटाळून जागून काढावी लागते. आमचे पुन्हा माळीण होऊ देऊ नका. सरकारने तातडीने पुनर्वसन करावे.”
सुरेश भवारी यांचा प्रश्न प्रशासनाच्या संवेदनशीलतेलाच आव्हान देणारा आहे. “पावसाळ्यात घर सोडून कुठे जायचे? उन्हाळ्यातच पुनर्वसन केले असते, तर आज जीव मुठीत धरून जगावे लागले नसते.”
आज काळवाडीतील प्रत्येक घरातून एकच आक्रोश ऐकू येतो—”आम्हाला सहानुभूती नको… सुरक्षित आयुष्य द्या.”
माळीणसारख्या दुर्घटनेनंतर “अशी घटना पुन्हा होणार नाही,” अशी आश्वासने देणाऱ्या यंत्रणेसमोर आज काळवाडी उभे आहे. फरक एवढाच की, यावेळी निसर्गाने आधीच इशारा दिला आहे. डोंगराला भेगा पडल्या आहेत, घरांना तडे गेले आहेत आणि ग्रामस्थांच्या मनात भीतीचे डोंगर उभे राहिले आहेत.
आता प्रश्न एवढाच आहे… प्रशासन काळवाडीला वाचवणार की आणखी एका दुर्घटनेनंतर फक्त पंचनामे करणार?


