जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
“नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी तडजोड नाही”; आयुक्त कैलास शिंदेंची तातडीने पाहणीचे आदेश
नवी मुंबई : नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने प्रशासनाला धारेवर धरणारे प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक अभिजीत अनंत देसाई यांनी आज नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेत दोन महत्त्वाचे प्रश्न थेट मांडले. जुईनगर-सानपाड्यातील अपुरा पाणीपुरवठा आणि सेक्टर ४ मधील अपुऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.
वाढती लोकसंख्या आणि नव्या वसाहतींमुळे जुईनगर व सानपाडा सेक्टर १० परिसरातील पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर तात्पुरती मलमपट्टी न करता जुईनगर-सानपाडा परिसरात नवीन जलकुंभ उभारण्याची आग्रही मागणी देसाई यांनी केली.
त्याचबरोबर सेक्टर ४ येथील जुनी स्मशानभूमी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडत असल्याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लगतच्या भूखंडावर अत्याधुनिक नवीन स्मशानभूमी उभारण्याची मागणी त्यांनी केली.
देसाई यांच्या मागणीची दखल घेत आयुक्त कैलास शिंदे यांनी दोन्ही विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
“नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा थांबणार नाही. प्रश्न सुटेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” अशी भूमिका अभिजीत देसाई यांनी स्पष्ट केली.
पाणी, रस्ते, आरोग्य किंवा अन्य नागरी सुविधा असोत, प्रशासनाच्या दारात प्रश्न घेऊन जाण्यापेक्षा तो प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची देसाई यांची कार्यपद्धती प्रभाग क्रमांक २२ मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.



